नमस्कार मी बापूसाहेब सोनवणे आपले स्वागत करतो.



सुस्वागतम शैक्षणिक माहितीबरोबरच इतरही अनेक प्रकारची माहिती देणाऱ्या या व्यासपीठावर आपले स्वागत आहे.

Tuesday, 4 October 2016

अभयारण्य पाहून जंगल समजत नाही!

अभयारण्य पाहून जंगल समजत नाही!
(भाग २)
पहिलेपणाचा आनंद वेगळाच असतो. जसं ९२ साली मी पहिल्यांदा ‘कान्हा’ पाहिलं, तेंव्हाचा आनंद मला आजून आठवतो! एवढ मोठं जंगलं, त्या जीप्सीज, रेस्टहाउस, ती चितळ, ते कान्हातले रस्ते, तो वाघ दिसणं, तो माहोल.... मन अगदी आभाळ झालं होतं! मागच्या भागात मी वर्णन केलंय, अगदी तसंच! पण तो पहिलेपणाचा आनंद होता. दुसऱ्या वेळी आनंद निम्म्याने कमी आला. आणि पुढेपुढे तर मला या सगळ्या गोंधळात आनंद वाटेनासा झाला. जिम कोर्बेट पासून सायलेंट व्हॅली पर्यंत अनेक जंगलं फिरलो. पण प्राणी दिसणे, या पलीकडे ज्ञानात फारशी भर पडली नाही. पूर्वी पेशवे पार्कमध्ये प्राणी दिसायचे. ते पिंजऱ्यात असायचे. इथे जंगलात असायचे. फारसा फरक वाटेना. त्यातून प्रत्येक वाघाची नावं वगैरे ऐकून मूडच जाऊ लागला. काहीतरी चुकत होतं...
कोयानेचं जंगलं आणि पश्चिम घाटांवरच्या जंगलातून मी आडमाप फिरलोय. पावसाळ्याचे महिने धरून प्रत्येक महिन्यात किमान चारचार दिवस, असा वर्षानुवर्ष फिरलोय. ज्या ठिकाणी माणूस सोडाच, पण माणसाचं कुठलंच अस्तित्व जाणवत नाही, आशा जंगलांमध्ये राहीलो आहे. या जागलांमध्ये मला जे अनुभव आले, जो आनंद आला, तो इतका खर्च करून, इतका आटापिटा करून, सहासहा दिवस खर्च करूनही व्याघ्रप्रकाल्पांमध्ये आला नाही. प्राणी दिसले आणि फोटो काढले, याव्यतिरिक्त सांगण्यासारखं फारसं काही नाही! असं का झालं असावं?
व्याघ्रप्रकाल्पां इतक्या संख्येनं प्राणी मी कोयानेचं जंगलं आणि पश्चिम घाटांवर पाहिले नाहीत. यात काहीच वाद नाही. जरी सगळे प्राणी अनेकदा पहिले असतील तरी दहापंधरा वाघ चार दिवसात वगैरे अचाट प्रकार मला कान्हातच करता आले. कोयानेचं जंगलं आणि पश्चिम घाटांवरच्या जंगलात मोठे प्राणी दिसले, पण इतक्या संख्येनं नाही! छोटे जीवच जास्त दिसले. तरीही मला याच जंगलांमध्ये जास्त आनंद आला, जास्त ज्ञान मिळालं. कारण सांगतो...
व्याघ्रप्रकाल्पात जाताना आपण खूप प्रवास करून जातो. कानात आणि डोक्यात तो प्रवास, ती रेल्वे, त्या गाड्या यांचे आवाज असतात. चोवीसेक तासांनी आपण एखाद्या सुसज्ज रेस्टहाउस मध्ये शिरतो. सुंदर रूम्स, आरामदायक डबल बेड्स, रग, एसी, सुंदर मोठ्या बाथरूम्स, गरम पाण्याचे शोवर्स, कमोड वगैरे.... जेवणाचा थाट तर विचारू नका! सूप, उत्तम नाष्टा, पंजाबी जेवण, चहा, कॉफी, बिस्कीट... काय नाही ते विचारा! मग कॅम्प फायर, एखादा फिल्म शो...
मग पहाटे ती जीप येणार, चकाचक कपडे घालून जीपमध्ये बसायचं, जीप्सची गर्दीच गर्दी! किती? शंभर दीडशे जीप्स. तिकीट वैगरे सोपस्कार कोण करतं कुणास ठाऊक? मग जंगलात शिरणं... तो गाईड काहीतरी बडबडत असतो. हिंदीत... मग ती चितळ, संबरं, भेकारं, रानडुकर, रानकुत्री, मोर वगैरे.. मग दोन तीन फेऱ्यात वाघ! मग गंगेत घोडं नहालं... तेच ते, तेच ते... तारीख पे तारीख, तारीख पे तारीख... मी नंतर अनेकदा विचार केला, यात मला जंगलाचा आनंद का येत नसावा?
पाहिलं म्हणजे मला जंगलाचं ’फील’ यायला माझी शहरी जीवनाशी असलेली नाळ तुटावी लागते! आपण कितीही जंगलाच्या आत गेलो, तरी डोक्यात ती गाणी, ते रेस्टहाउस, तो एसी, कमोड, ती अलिशान बाथरूम, ती स्वादिष्ट जेवणं, ज्या जीप मध्ये आपण बसलो आहोत ती जीप, अंघोळ केल्याचा स्वच्छपणा, त्या दुर्बिणी, कामेरे, कधीकधी सेंटचे वास... आपली शहरी नाळ तुटतच नाही! जंगलात असतानाही आपण अत्यंत संरक्षित वातावरणात असतो. मध्ये पिंजरा नसतो, त्या ऐवजी जीप असते. पण आपली मानसिकता ही प्राणीसंग्रहालायाचीच असते. प्राणी सोडून आपण जंगलातलं काहीच बघत नाही. कारण खाली उतरायला परवानगीच नसते! प्राणीसंग्रहालायात प्राणी बंद असतात, आपण मोकळे असतो. इथं ते मोकळे असतात आपण जीपमध्ये बंद असतो. मानसिकता तीच! मधल्या एका दृष्य किंवा अदृष्य पिंजऱ्यामुळे त्यांच्या आणि आपल्यात एक भिंत असते. एक दृष्य किंवा अदृष्य संरक्षण असतं.
म्हणूनच मला अभयारण्यात जंगलाचं ‘फील’ कधीच येत नाही. काहीही झालं तरी मी सुरक्षित आहे. परत जाणार आहे. माणसाच्या घरात झोपणार आहे. खाली गडी आहे. पांघरायला गरम पांघरूण आहे. आणि मुख्य म्हणजे रात्री जेंव्हा जंगलाचा सर्वात भीतीदायक काळ असेल, अंधार पडेल, मला काहीही दिसणारं नाही. जेंव्हा सगळं जंगलं जागं होईल, मला भीती वाटणारे प्राणी बाहेर पडतील, तेंव्हा मी रूममध्ये एसी लाऊन, रजईत, बंद खोलीत झोपलेला असेन....
म्हणजे अभयारण्यात मी मनाने कधीच निसर्गात मिसळू शकत नाही. नुसतं मनानंच नाही, शरीरानं, दिनचर्येनं, भावनेनं कशानंचं आपण त्या निसर्गाशी एकरूप होऊ शकत नाही. जंगलात प्राणी कसं जगात असतील? रात्र कशी काढत असतील, त्यांना थंडी वाजत असेल का? ते चपला बूट घालत नाहीत. त्यांना टोचत असेल का? मुख्य म्हणजे पावसाळा! जंगलात खूपच पाऊस पडतो. चारचार महिने पडतो. दिवसरात्र पडतो. अशावेळी ते काय करत असतील? कुठे आसरा घेत असतील? ओले गच्च भिजल्यावर त्यांना झोप कशी लागतं असेल? झाडं ओली, पानं ओली, माती ओली, खडक ओले, ओढ्यांना धोधो पाणी, त्यात जळवा, चावणारे किडे, कसं जगत असतील? यातला कुठलातरी प्रश्न अभयारण्य पाहताना पडतो का? म्हणूनच मी म्हणतो, अभयारण्य पाहून जंगलं समजात नाही!
तुम्हाला काय वाटतं?
‘जंगलं कसं पाहायला हवं?’... पाहूया पुढच्या भागात...
Shekhar n

No comments:

Post a Comment